
राजगडाच्या बालेकिल्ल्याच्या महाद्वारात.
मला नक्की तारीख वार आठवत नाही, कि या मैत्रीला कधी सुरवात झाली. पण आम्ही मात्र मानतो ही मैत्री अंदाजे ३५०/३६० वर्ष जुनी असली पाहिजे म्हणजे अगदी शिवकालापासून…
विशाल आणि मी Orkut वर भेटलो काय, आमची मैत्री झाली काय, अगदी स्वप्नात किंवा एखाद्या चित्रपटात घडत ना अगदी तसच घडत गेलं. पहिल्यांदा विशालची भेट झाली नाही, पण माझ्या नंतरच्या पुणे भेटीच्यावेळी विशाल भेटला आणि ते सुद्धा चक्क “भारत इतिहास संशोधक मंडळाच्या” इमारतीजवळच ! थट्टेचा भाग बाजूला पण मी, प्रणव आणि विशाल आमचं नेहमीच एकमत असायचं, आम्ही नक्कीच शिवाकालापासुनचे, पेशवेकालापासूनचे मित्र असणार, कदाचित महाराजांच्याच चाकरीत असू एकत्र. भालदार चोपदार आरोळ्या ठोकणारे ! संभाजी महाराजांचे सैनिक असू, किंवा बाजीराव पेशव्यांच्या झंझावाती फौजांमध्ये त्यांच्या सेवेत घोड दौड करणारे शिलेदार, बारगीर… किंवा गुप्त मसलतीतले हेर ही असु कदाचित… या नव्या (जुन्या) मित्रांना भेटून खूप बर वाटले.

रायगडावर उमेश
आम्ही एकत्र जमलो की खूप कमी वेळा इतिहासाव्यतिरिक्त गप्पा होत असतं. किंबहुना नाहीच, आम्ही भेटलो की गड, किल्ले, ऐतिहासिक पुस्तक, चांगले संदर्भ ग्रंथ यावरच चर्चा होत असे. कितीही वेळ मिळाला तरी वेळ कमीच पडत असे. त्यावेळी प्रणव, विशाल पुण्यात चांगल्या ठिकाणी नोकरी करत होते. पुढे २०१२ मध्ये कामातल्या प्राविण्यामुळे प्रणवला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. माझा स्वतःचा व्यवसाय. तिघांच्याही कामाचा पसारा पाहता आपली हातातली काम टाकून इतिहासाच्या मागे पळायच नाही किंवा तसा आग्रह देखील नाही करायचा… असा आमच्यात एक अलिखित करार झाला होता म्हणा ना… हो पण वेळ असेल तेव्हा मात्र आम्ही तासंतास या गुढ इतिहासाला बोलक करण्यात रमलेलो असतो.

सिंहगडावर विशाल.
शिवराज्याभिषेक दिनाला रायगडावर काही वर्ष गेलो पण नंतर २००८ सालचा राज्याभिषेक जरा वेगळ्याप्रकारे प्रणवच्या घरी साजरा केला. म्हणजे अगदी एखाद्या अज्ञात शक्तीने घडवून आणावा असा तो प्रसंग होता, म्हणजे अगदी सकाळी ११ पर्यंत काहीच ठरलं नव्हत, मी पण मुंबई मधेच होतो. अचानक ठरलं, आणि मी माझे दोन मित्र राहुल पेठे, प्रियांक आम्ही पुण्याला गेलो, तिकडे विशाल प्रणव यांनी उत्तम व्यवस्था केली. विशाल आणि माझ्या भावाने महाराजांची एक मूर्ती आणली. मग यथासांग पूजा केली, माझ्याकडील शिवराई, प्रणव कडील राजगडावरील छानसे दोन दगड, महाराजांची मूर्ती याला पंचामृताचा अभिषेक घालून पूजा केली. सगळे मिळून १०/१२ जण होतो. महाराजांची सावरकरांनी लिहिलेली आरती म्हटली. मग महाराजांचे घोडदळ, आरमार, हेरखाते, असे लेख वाचन झाल, चर्चा केली. कार्यक्रम आटपून आम्ही रात्री १२ च्या आत मुंबई मध्ये पोचलो होतो. तो दिवस मी कधीच विसरणार नाही. न ठरवता, अचानक आमच्या हातून झालेली महाराजांची सेवा म्हणजे एक अद्वितीय अनुभव होता. इथून आमची मैत्री जी अभेद्य झाली ती आजवर. पुढे २००९ साली पुण्यात राज्याभिषेक उत्सव थोडा मोठ्या प्रमाणावर अथश्री मध्ये भूषण, राहुल, स्नेहा, सुधीर या मित्रांच्या सहकार्याने झोकात पार पडला.
आम्ही एकत्र खूप भटकंती देखील केली, सिंहगड, कान्होजी जेधे देशमुखांची कारी, वढू, तुळापूर, रायगड, राजगड, लोहगड,रावेरखेडी येथील बाजीरावांची समाधी, पावनखिंड, समुद्री किल्ले तर किती सिंधूदुर्ग, विजयदुर्ग, हिम्मतगड अशा अनेक ठिकाणी भटकलो.
पहिल्यापासून जेष्ठ इतिहास तज्ञ डॉ. सदाशिव शिवदे, आणि श्री.निनाद बेडेकर, महाराष्ट्र भूषण शिवशाहीर श्रीमंत बाबासाहेब पुरंदरे यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले, दुर्मिळ पुस्तक, तसेच संदर्भ ग्रंथ यांनी आम्हला अभ्यासाकरिता वेळोवेळी दिले, त्यामुळे अशा जेष्ठ मार्गदर्शकांच्या सावलीत आमचा अभ्यास सुरु झाला आणि सुरु आहे.
आम्ही वेगवेगळ्या मतांचे, वेगवेगळ्या आवडी-निवडी असूनही या इतिहासाच्या अभ्यासामुळे एकत्र घट्ट बांधले गेलो आहोत. वाद आमच्यातही होतात, पण आमचा एका गोष्टीवर विश्वास आहे ते म्हणजे मैत्री जितकी घट्ट,तितकिच ती समंजस हवी. वाद वगैरे होतीलच पण ते तिथेच सोडून देता आले पाहिजेत. त्यामुळे अभेद्य बुरुजासारखी आमची मैत्री उभी आहे.
ब्लॉग च्या निमित्ताने लेख माला लिहिण्यास सुरवात केली आहे, शिवकाल, शंभुकाळ, पेशवेकाल, असे आणि इतर विभाग बनवून त्यावर अभ्यास पूर्ण लेख लिहिण्यास सुरवात केली आहे. या लेखांतून इतिहासाबद्दल जास्तीत जास्त व अप्रकाशित नवीन माहिती मिळवून काही गैरसमज असतील तर ते दूर करण्याचा प्रामाणिक हेतू/प्रयत्न आहे. ज्ञान वाटल्याने वाढते अस म्हणतात, त्याचा अनुभव घेत होतो.

“समान शीले व्यसनेशु सख्य”
पुढे या प्रवासात पुढे आणखी काही सहप्रवासी येऊन मिळाले. कौस्तुभ कस्तुरे, रोहित पवार, योगेश गायकर आणि शिवराम कार्लेकर. खऱ्या अर्थी परिपूर्ण झाल्याचा अनुभव आला. सगळेच सगळ्याच क्षेत्रात जाणकार नसतात एकीची ताकत काय असते याचा अनुभव आला. २०११ मध्ये सुरु केलेल्या माझ्या प्रकाशन संस्थे तर्फे आमच्या ब्लॉगचं आणि आम्हाला या प्रवासात येऊन मिळालेल्या मित्रांच्या लेखांचं “इतिहासाच्या पाऊलखुणा” नावाचं पुस्तक केलं. आणि कौस्तुभचं “पेशवाई” हे पुस्तक प्रकाशित केलं. १६७४ पासून १८१८ पर्यंतचा सर्व कालखंड यात अंतर्भूत केला गेला आहे. वाचकांनी अभ्यासकांनी जाणकारांनी भरपूर कौतुक केलं. दोन्ही पुस्तकांना उत्तम प्रतिसाद मिळाला.

इतिहासाच्या पाऊलखुणा
वर नावं घेतलेल्या सर्वांचं वर्णन करायचं म्हणजे एक एक स्वतंत्र लेख होईल म्हणून इतकंच सांगतो कि सगळे अभ्यासू उत्तम वाचक आणि पुराव्यांअभावी एक ओळही लिहिणार नाहीत असेच होते. त्यामुळे आमचं गणित जमलं. आता आम्ही सर्वजण एकत्र अभ्यास करतो. चर्चा करतो. प्रसंगी मत मतांतरं येतात तेव्हा वादही घालतो. पण मी म्हणतो तेच खरं असा हट्ट कधीच कोणाचा नसतो. त्यामुळे वाद मागे सोडून पुढील प्रवास सुरु करतो. ही तर सुरवात आहे. अजून बरंच काम करावयाचे आहे. त्यासाठी जाणकार वाचक मार्गदर्शक यांचे आशीर्वाद हवेच आहेत.
दुःखाची एकच आठवण म्हणजे आमचे गुरु जेष्ठ इतिहास संशोधक श्री. निनादराव बेडेकर अर्थात आमचे लाडके निनाद काका १० मे २०१५ रोजी आम्हाला सोडून देवाघरी गेले. आम्ही अक्षरशः पोरके झालो. आमचा दीपस्तंभ हरवला. काकांजवळ घालवलेला एक एक क्षण आम्ही टीपकागद बनून त्यांनी दिलेलं ज्ञान टिपण्यात घालवला आहे. ते क्षण कधीही न विसरण्यासारखे. तरीही न डगमगता काकांनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहण्याची शपथ घेऊन आम्ही मार्गस्थ झालो. प्रत्येक्षणी काका आम्हाला पाहत आहेत याची खात्री आहे. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी म्हणून काकांची मान सदैव अभिमानाने ताठ राहील याची नक्कीच काळजी घेऊ.
मी उमेश तुम्हा वाचकांच ब्लॉग वर स्वागत करतो. लेखांतून काही चुका अढळल्यास पुराव्यानिशी जरूर कळवा त्या वेळोवेळी सूचनांप्रमाणे तपासणी करून, दुरुस्त केल्या जातील.
– आपले विनीत –
उमेश, विशाल
Email : padmadurg@gmail.com
Twitter :@padmadurg
WordPress Blog Handle : https://raigad.wordpress.com
Direct Access URL : http://www.marathahistory.com
Like this:
Like Loading...