गोविंदपंत बुंदेले – ‘आम्ही कान धरली शेळी आहो’

गोविंदपंत बुंदेले (मूळ आडनाव खेर) हे मराठ्यांचे उत्तरेतील एक मातबर सरदार होते. छत्रसालाकडून मिळालेल्या बुंदेलखंडातील राज्यावर सुमारे १७३३ दरम्यान त्यांची नियुक्ती झाली असावी. प्रस्तुत पत्र हे एका वेगळ्या अर्थाने इतिहासावर प्रकाश टाकणारे आहे. जातीवरून शिव्यांची लाखोली वाहणारे स्वयंघोषित इतिहासप्रेमी आज ब्राम्हण समाजाला टार्गेट करतात. पेशव्यांनी स्वराज्य बुडवले, मराठा सरदारांना ‘बामण’ पेशवाईत चांगले वागवले गेले नाही असे बिनबुडाचे आरोप करत हिंडतात. हे पत्र २३ सप्टेंबर १६५५ रोजी गोविंदपंत बुन्देल्यांनी नानासाहेब पेशव्यांना लिहिले आहे. उत्तरेतील हकीगत सांगणारे हे पत्र स्पष्ट आणि बोलके आहे. अभ्यासकांनी पत्र निट वाचावे. एका बोलक्या वाक्यात पत्राचा सारांश सांगायचा म्हणजे – “…बख्र-उल्ला खान नावाचा पातशाहीत नामी सरदार होता, त्याला परम संकटात जाऊन, परम उपाय करून (बुंदेले यांनी) बुडवला.… (खंत व्यक्त करताना गोविंदपंत लिहितात) मराठा सरदार हे कर्म करिता तर जमिनीवर न माता (मराठा सरदारांपैकी कुणी हे कार्य केले असते तर त्याला स्वामींनी आभाळात ठेवले असते /  खूप गौरव केला असता) आम्ही स्वामींचे ब्राम्हण आमची शिफारस कोण करणार? (गोंविंदपंत ब्राम्हण म्हणून त्यांच्या पराक्रमाकडे कानाडोळा झाला असे ते लिहितात / त्यांनी कुरा कोडा नावाचे अलाहबाद नजीकचे प्रांत हस्तगत केले होते) “. पुढे अब्दालीच्या तुकडीकडून हेच गोविंदपंत बुंदेले पानिपत संग्रामापूर्वी मारले गेले. अधिक काय लिहावे.

मूळ पत्र संदर्भ – मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड ३ (जुना) – लेखांक १३७

गोविंदपंत बुंदेले यांचे नानासाहेब पेशवे यांना लिहिलेले पत्र

गोविंदपंत बुंदेले यांचे पत्र

 

 

 

अभ्यास शिवभारताचा – १ – ‘गोब्राम्हणप्रतिपालक’

शिवभारत हे शिवाजी महाराजांच्याच पदरी असणारया कवींद्र परमानंद गोवीन्द नेवासकर याने रचलेले महाकाव्य आहे.

। चरितं शिवराजस्य भरतस्येव भारतम ।

अशी समर्पक व्याख्या देत त्याने चरित्राला सुरुवात केली आहे, अर्थ काय तर जसे व्यासांनी “महाभारत” रचून भरत वंशाच्या राजांची कहाणी मांडली तशीच योजना मनी बांधून कविन्द्रांना शिवाजी महाराजांचे चरित्र “शिवभारत” रुपात लिहावयाचे होते. या सदरात आपण याच बहुमोल ग्रंथाचा अभ्यास करणार आहोत. रचना समकालीन असल्याने त्याचे महत्व अमोल आहे. या ग्रंथातील अनेक नोंदी, वर्णने आणि प्रसंग आपण या सदरात अभ्यासणार आहोत.

सुरुवात करूया एका वादग्रस्त विशेषणाने – “गोब्राम्हणप्रतिपालक”

आजकाल ब्राम्हणांना शिव्या देणे म्हणजे Fashion झाली आहे, त्यामुळेच गोब्राम्हणप्रतिपालक हे विशेषण शिवछत्रपतींना कुणी लावले जर काही विघ्न संतोषी लोक आगपाखड करतात. शिवाजी राजे हे शिवाजी राजे होते, ती तुमच्या आमच्या सारखी सामान्य व्यक्ती नव्हती. जनतेचा प्रतिपाळ करणारा तो एक प्रजापालक राजा होता. त्याच्या रयतेत सर्व सामील होते. ब्राम्हण एका गावात हाकलून देवून आणि ते गाव स्वराज्याच्या सीमेबाहेर ढकलून त्यांनी राज्य केलेले नाही. एरवी शिवभारत हा समकालीन आधार मानणारे स्वयंघोषित इतिहासकार आणि जिज्ञासू मात्र त्यातच असणारया ह्या विशेषणाकडे संपूर्ण दुर्लक्ष कसे करू शकतात ?

तर हा आहे स्पष्ट आणि समकालीन शिवाजी राजे यांचा गोब्राम्हणप्रतिपालक असलेला उल्लेख –

शिवभारत - गोब्राम्हणप्रतिपालक

शिवभारत – गोब्राम्हणप्रतिपालक

उल्लेख पहिल्या अध्यायात १५ व्या श्लोकात असून, काशीनिवासी श्रोते मंडळी हे कविन्द्रांना विनवणी करताना शिवाजीराजांना जी विशेषणे वापरतात त्याची इथे नोंद घ्यायची आहे. इथे ब्राम्हण या जातीचा उदो उदो नसून सत्य ते मांडण्याचा हेतू आहे ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी. कारण पुढे चुकल्यावर जिवाजी विनायकाला ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो? असा करडा सवाल करणारे सुद्धा हेच शिवछत्रपति होते. तेव्हा जातीच्या रकान्यात ह्या राजाला न अडकवता एखाद्या आई प्रमाणे प्रजेची काळजी, सांभाळ आणि वेळी कान-उघडणी करणारा व्यक्ती म्हणून पाहणे महत्वाचे आहे.

बहुत काय लिहिणे, तरी आपण सुज्ञ असा !

%d bloggers like this: